रोडच्या त्या साईडला तो बराच वेळ उभा होता .
ओपीडीत आज रविवार असल्यामुळे व रविवारी ओपिडी बंद ठेवत असल्याकारणाने जास्त कुणी पेशंट ही नव्हते.
पण यावेळी आठवड्यातून असलेली व्हिसिट लॉक डाऊन मुळे रद्द करावी लागली होती. म्हणून मग घरी थांबाण्यापेक्षा ओपिडीत बसावे असा विचार करुण क्लिनिक उघडले .
रिसेप्शनिस्ट सुट्टीवरच होती .म्हणून मुद्दामहून ओपिडीत येणाऱ्या जाणाऱ्यावर नजर ठेवून होतो.
क्लिनिक च्या मेन शटर च्या अगदी समोर पोरगेला एकजण उभा होता .
तो मी बसलेल्या चेअर वरुन समोरच दिसत असल्यामुळे न राहून त्याच्याकडे वांरवार लक्ष जात होते .
बाहेर किराणा दुकान , पिठाची गिरणी व एक दुधाची डेअरी एवढी सोडली तर बाकी सर्व दुकाने बंदच होती.
आकरा साडेअकरा झाले असतील ..तुरळक लोक रोडवर ये जा करत होते .
कुठे पोलिसांचे पेट्रोलींग च्या गाडीचा सायरन दूरवर ऐकू येत होता .
तब्बल अर्ध्या तासापासून तो उभा होता, शेवटी न राहून व जराशा शंकेने म्हणा हवं तर त्याला बाहेर जाऊन मी आवाज दिला
" काय रे काय करतोय इथे ? "
तसा तो रोड क्रॉस करुन इकडच्या साइड ने आला .
मळकट निळा टि शर्ट घातलेला .वरची दोन बटण तुटलेली होती . केस अस्तव्यस्त झालेले ,खाली खाकी कलरची हाफ पॕन्ट घातलेली होती . दोन्ही पायात स्लिपर होती दोन वेगवेगळ्या कलरची
गळ्यात लाल दोरा होता .
कपडे जसे हॕन्कर ला लटकावे तसे त्याचे हात पाय त्या ड्रेस मधून जाणवत होते
तेरा चौदा च्या आत बाहेर असावा ...
"काही नाही साहेब थोड सामान घ्यायचं होत .."
जवळ येत तो म्हणाला .
" किराणा घ्यायचा का ? "
तो काहीच नाही बोलला ..
"अरे मग सामान म्हणजे काय ,बाकी तर बंद आहे सगळ्या दुकान "
मी जरा दाटून मोठ्याने बोललो ..
"पीठ घ्यायचं साहेब "
"दळन आणलेस का ..मग तसे सांगायच ना .."
नाही साहेब दळन नाही आणले ..
अरे तु आत्ताच तर म्हणाला ना पीठ घ्यायचे असे ..
"पीठ घ्यायचे पण गिरणी चालू आहे..ती बंद व्हायची वाट बघून राहीलो "
आता मला जरा त्याच्या बोलण्याची चिड आली ..
आधी म्हणे दळण नाही आणले ,मग म्हणतो पीठ घ्यायचे ,नंतर म्हणतो गिरणी बंद व्हायची वाट बघतोय ...
अशी उडवा उडवीची उत्तरे ऐकून मला जरा आणखीनच शंका यायला लागली त्याच्यावर .
जरी वय कमी असले तरी कुणाचा काय भरवसा म्हंटल ..
जरा दरडावून विचार काय प्रकार आहे सांग गुपचूप ..केव्हाच बघतोय समोर उभा आहेस तु.. काय घरावर पाळत ठेवतोय का ...
खरं खरं सांग ..
"नाही नाही तसे नाही साहेब ..खरचं पीठ घ्यायला थांबलो इथं ."
गिरणीवाल्याला विचारा हवं तर .."
बोलण्यातून दयेचा सुर जाणवला ..बोलताना ही नीट मराठीत बोलत होता ..
जरा नरमाईने घेत मी म्हटलं ..
"कुठून आला ..घर कुठे तुझे "
"मनमाड "
ही अजून एक गुगली होती माझ्यासाठी ..
मला कशाचाच कशाशी मेळ लागेना ..
"मग इकडे काय करतोय नीट सांग मला ..घडीत एक सांगतो घडीत काही वेगळच "
पाणी देता का जरा ,उन्हात उभा राहून तहान लागली...
त्याला जरा वेटींग मधे ठेवलेल्या ग्लासात पाणी दिले.
"सांग आता "
माझा धीर सुटत चालला होता आणि एक अनामिक उत्सुकता ही लागली होती तो काय सांगतो याची .
"मी मनमाड चा आहे साहेब ..
रेल्वे स्टेशनवर राहतो "
" घरचे " त्याचे बोलणे अर्धवट तोडतच मी बोललो..
"नाहीये .."
नाहीये म्हणजे ..?
"माहित नाही .."
"मग इकडे कसा आला आणि काय करतोस तू ..?"
"मी स्टेशन वरच राहतो ..रेल्वे मध्ये गोळ्या ,बिस्किट विकतो .."
बापरे तु म्हणतो घरचे नाही कुणी मग त्यासाठी पैसे कुठून आणतोस ..
"स्टेशन बाजूला दुकानदार आहे ,सामान त्याचे असते सर्व मी फक्त विकतो ,जेवढे विकेल त्यातून मला कमिशन मिळते ..
अच्छा ..शिक्षण झालंय का काही ?
त्याचे राहनीमान आणि त्याची बोलण्याची भाषा याचा मेळ बसत नव्हता ,तो उत्तम मराठी बोलत होता ..
"शिक्षण नाही झाले साहेब पण इंग्लिश हिंदी मराठी उर्दू या सगळ्या भाषा येता मला कमीजास्त .."
माझा इन्टरेस्ट वाढत होता त्याचे बोलणे ऐकून ..
"येवढे सगळ्या भाषा कशा येतात तुला मग .."
"साहेब रेल्वेत धंदा करतो ना ,रोज हजारो प्रकारची लोक भेटतात ..
सगळे क्लास माहीती आपल्याला .."
क्लास शब्द उच्चारताना त्याने हात उंचवून अगदी अॕक्शन करुन दाखविली .
एवढासा पोरगा तो पण त्याचे बोलणे ऐकून मी अचंबीत होत होतो .
"आणि इकडे कसा आला मग"
"ते स्टेशन बंद झाले ना ..रेल्वे बंद झाल्या ..काचीकुडा ने वापस जायच तर गाडी तिकडेच थांबली ..
कसली सोय नाही..मग या रोटेगाव स्टेशन ला मालगाडीने आलो पण ती इथवरच होती ..
"मग इकडे कसा आला ..?"
"पोटासाठी साहेब
विकायला सोबत आणलेला माल संपला .गोळ्या बिस्कीट सगळे खाल्ले..
भूक लागली तर गावात फिरलो पण
घर दार बंद सगळीकडे ,मागायला गेलो तर जवळ येऊ देत नाही कुणी ..
काल परवा एक दोघांनी पोळी भाजी दिली त्यावर गुजारना झाला पण ती लोक आज दिसली नाही परत मग
गावात पायी चालत आलो ..
सगळीकडे बंद होत ..
पोलिसांचे चार दोन फटके चूकवत इकडे आलो.
त्या गिरणी वाल्याला पीठ विचारलं "
"कसलं पीठ ..?"
"ते दळताना खाली पडते ते उरलेल पिठ ..
तो देतो बोलला म्हणून थांबलो होतो इथे .."
"त्या पिठाचं काय करणार ..? "
आश्चर्याने मी विचारले
साहजिकच मला प्रश्न पडला ,ना घर ना दार मग हा पीठ घेऊन करेल काय ..
"पीठ खाऊन पोट भरेल साहेब .."
हे सांगताना त्याच्या चेहऱ्यावर कसलेच संवेदना नव्हत्या .चेहऱ्यावरील भावछटेत कुठलाही बदल न करता अगदी निरागसतेने तो बोलला ..
पोटाची खळगी भागविण्यासाठी ह्याने शोधलेला हा पर्याय माझ्यातरी ऐकविण्यात नव्हता ..
काय बोलणार .पुढे मला सुचेना ..
त्या गिरणी वाल्याचे आभार मानावे कि स्वतःची लाज बाळगावी ते कळेना ..
त्याची परिस्थिती जेमतेम असूनही त्याने निदान पिठाची का होईना मदत केली आणि मी उगाच त्या पोराला संशयाने बघत होतो केव्हापासून ..
माझी मलाच लाज वाटली.
जनावरांची चंदी ( खाद्य) बनवायला जे पीठ वापरले जाते त्यातून हा पोटाची भूक शमवत होता .
या पेक्षा वाईट ते काय असु शकते ..
तेरा चौदा वर्षात या मुलाला आयुष्याकडून आलेल्या अनुभवाने काय काय शिकविले होते ..
कुठल्याही परिस्थितीचे भांडवल न करता त्या परिस्थितीतून स्वतःला तो क्षणोक्षणी घडवत होता .
मागेपुढे कुणी नसताना ही 'मला जगायचं' हे ध्यानी ठेवून, त्याचा रोज जगण्यासाठीचा संघर्ष सुरु होता .
तेही सतत डोळे आणि कान उघडे ठेवून ..
आजूबाजूला घडणाऱ्या ..बघितलेल्या सर्वच घटनांमधून तो शिकत होता ,ज्ञान ,बोध घेत होता आणि स्वतःला घडवत होता ..बालमजूरी व ती करवून घेणे हे कायदाने गुन्हा आहे हे त्याला कदाचित ठाऊकच नसावे .
गिरणीतले खाली पडलेले पीठ कुणाची एक वेळची भूक देखील भागवू शकते हे मला पहिल्यांदा समजले होते ..
घरात आपल्याला रोज तीच तीच भाजी पोळी खाऊन कंटाळा येतो.भात ..कांदापोहे ,पकोडे आणि अजून बरेच काही जिभेचे चोचले थांबता थांबत नाही .आज हे तर उद्या ते चमचमीत खायला हवं असते.
सध्या बराच रिकामा वेळ मिळतोय तर आपण नवनवीन पदार्थ बनवायला शिकतोय ..निदान त्याने तरी जिभेवर नवी चव रेंगाळेल आणि वेळचा उपयोग होऊन करमणूक पण होईल मग त्याच डिशेस चे फोटो सोशल मिडीयावर टाकायचे ,आपल्या लाईक्स आणि कमेंट ची संख्या वाढविण्यात आपण व्यस्त असतो.
पण त्याच वेळी एकवेळच्या जेवणासाठी कुणी दाराबाहेर आपली बाहेर डोकवण्याची वाट बघतयं हे आपल्या ध्यानीही नसते.
जागतिक महामारी येतात आणि जातातही.. काही घेऊन तर बरेच काही देऊन जातात..शिकवून जातात...माहमारीने मरणांऱ्यापेक्षाही अन्नाशिवाय भूकेने मरणऱ्यांची सख्यां कैकपटीने जास्त आहे
फक्त पीठ खाऊनही जगता येत हे नव्यानं कळालं होत .
लाजेखातर का होईना त्याला मदत करावी असे मला मनोमन वाटले ..
माझ्या परीने त्याची सोय केली .
तो जाण्यासाठी वळला..
उद्याचा सशक्त भारत ..भूकेने हतबल झालेला .
पुढे चालता झाला .
विज्ञानाच्या साहाय्याने चंद्रापर्यंत झेपावणाऱ्या देशांनी भूक न लागणारे औषध शोधायला हवे असा विचार मनात चमकून गेला.
त्या पाठमोऱ्या उज्वल प्रगतशील भारताकडे मी बराच वेळ बघतच होतो.
......@डॉ .प्रविण तांबे
- ७७०९५८६०८२